शिवचरित्र भाग 5 ( यह तो पत्थरों की बौछार है! )

 

 यह तो पत्थरों की बौछार है!


बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ मारल्या जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता. पण बाजी जेध्यांच्या बहादुरी मुळे तुकडी आणि झेंडा वाचविल्या गेले. ते सुद्धा गडावर आले. रात्रीची वेळ होती , पूर्ण विजय होऊ शकत नव्हता , पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती.


महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला आदेश दिला की , पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहान मोठे ढिगारे घडीभरात जमले.


महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले , ‘ आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कोणीही त्याच्यावर कसलाही मारा करू नका। येऊ द्या त्याला वर। आम्ही इशारा करू आणि मग तुम्ही शत्रूवर या मोठ्या मोठ्या धोंड्यांचा मारा करा.


‘ सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा आक्रमण करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध साहित्य सुद्धा कमी. मावळी सैन्य सुद्धा कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोंड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर धोंड्यापासून मिठी भर धोंड्या पर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्याद्रीतील हे दगडी सैनिक महाराजांनी अगोदरच तयार ठेवले होते.


महाराजांचा अंदाज अचूक ठरला। उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. अगोदरच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या शाही फौजेला घोड्यावरून उतरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा आदेश दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्म्यापर्यंत चढली सुद्धा . आणि ऐन वेळेच्या टप्प्यात शत्रू आलेला बघताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला. आणि गर्जना सुरू झाल्या. शिंगे धुत्कारूलागली. आणि मग ते लहान मोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला. कुणी मेलं , फार जण जखमी होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता.


फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच झाला। आणि म्हणाला , ‘ यह तो पत्थरों की बौछार है!


‘ आता ? मावळ्यांना जोश आला होता। केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता. गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या मारत , पडत , घसरत , दगडांचा मार खात हे शाही सैन्य तुटून गेलं होतं. जणू वादळातला पालापाचोळा. या फत्तेखानाची आता फळी फुटली होती. महाराज आपल्या सैन्या सोबत गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले. अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम सासवड गावात आशयाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं.


फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी कमीत कमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यासोबत , पूर्ण पराभव केला होता. कोणची ही जादू ? कुणाचा हा चमत्कार ? हा गनिमी काव्याच्या शक्तीयुक्तीचा परिणाम , जादू , चमत्कार. विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं.

Post a Comment

0 Comments