शिवचरित्र भाग 7 ( तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! )



 तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ!



 विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी खूप यश मिळविलं। पण शिवाजीराजे वडिलांवर रागावले , चिडले आणि संतापले सुद्धा . का ? कारण शहाजीराजे बेसावध राहिले ,अफजलखानाने वडिलांना पकडले आणि भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना सहनशक्तीचा समोर झाल्या. हे सर्व शहाजीराजांच्या गाफिल पणामुळे झालं.


खरंच होतं ते। याची जाणीव शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती. पण वाद सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हातात असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे शहाजीराजांवर रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली.याचे परिणाम  या लहानच्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणा गड बादशहाला फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख शिवाजीराजांना होत होतं. 

कोंढाणा आदिलशाहीत वापीस देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली। आणि महाराज चिंतीत झाले. ते कोंडाणा गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले.

मिळालेल्या यशामुळे राजगड खूप आनंदात होता। फक्त शिवाजीराजे शांत होते , कोंढाण्यावर. शिवाजीराजे एकटे कुठंतरी जाऊन बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली. सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्यावर त्यांची अपार माया. ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना विचारले . ‘ महाराज , आपण इतके चिंतीत का ? आता काळजी कशाची ? तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून आझाद झाले. आपले राज्यही आपण वाचविले. मग चिंता कशाची ?


‘ शिवाजीराजांनी गंभीर शब्दात म्हटलं , ‘ काय सांगावं! आमचे तीर्थरूप साहेब बेसावध राहिले आणि आदिलशाही जाळ्यात अडकले। आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपल्या स्वराज्यातील कोंढाणा गड परत देऊन टाकण्याचे कबूल करून टाकले . काय म्हणावं आता या गोष्टीला ? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले.


‘ हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच रागात येऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले , ‘ महाराज , काय बोलता आहा तुम्ही हे ? वडिलांच्याबद्दल असं बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही.


‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले। ‘ महाराज वडील चुकले तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नाही . कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज! वडिलांचा मान राखावा.


‘ शिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले , ‘ नाही , आमचं चुकलं। वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. आपल्या स्वराज्याचे नुकसान ,माझ्या मनाला मानवले नाही म्हणून बोललो. आपला कोंढाणा गेला म्हणून बोललो.


‘ ‘ महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे ? हा अति मोलाचा गड देऊन टाकावा। महाराज , आपण तर अवघा मुलूखावर कब्जा करा. उदास होऊच नका. ‘ महाराजांना ही युक्ती फार मोलाची वाटली . पटली. त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ‘ होय ‘ जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी ज्यांनी आमच्या वडिलांचा असा हीन अपमान केला ,  त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे , ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ.


‘ सोनो विश्वनाथ या राज वचनांनी सुखावले। अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्या बद्दल आमचा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं बघून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू यावे असंच बोलणं राजा बोलला.


हे सगळं बोलणं कवींद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवलं होत । त्यांचाच हा आशय.


कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे तर वडिलांच्या आज्ञेवरून!

Post a Comment

0 Comments