शिवचरित्र भाग 3 ( स्वराज्य हवं की बाप हवा )

 


स्वराज्य हवं की बाप हवा .


जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले। शहाजीराजे तिथे राहत  होते। तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहत होते।


पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरा गेले । शहाजीराजांचे सर्व कुटुंब एकत्र येण्याचा आणि जवळपास दोन वर्षे सोबत राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षामध्ये हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटक स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याची वेळ शिवाजीराजांची आली होती . विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूप पाहायला आणि शिकायला मिळत होते . एवढे मोठं साम्राज्य एका राक्षसतागडीच्या युद्धात धुळीला कसे काय मिळाले ? हा शेवटचा रामराजा कुठे चुकला ? त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे ?


या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता। त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुद्रमंथन राजांच्या मनात  इ.स 1640 ते 1642 या वर्षात घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परत आले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच ! आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सहयाद्री शिखरावरती बंडाचा झेंडा उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी आपल्या ताब्यात  घेतला. आदिलशाही थक्कच झाले . एक मराठी लहान मुलगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे. या विचाराने मोहम्मद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या वडीलालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपून जाईल . शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. आणि परत कोणीही बंडाचा विचार सुद्धा करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौज सुद्धा पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.


पण याच काळात शहाजी महाराजांना कैद करायची गरज पडली आहे  तर ठार सुद्धा मारायला ठाम राहायचं  आणि रोज २५ जुलै १६४८ या दिवसाला शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वास घातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असुन सुद्धा शहाजीराजे गाफील राहिले आणि झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या घातल्या . राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडूमध्ये मदुर जवळ घडली.


शहाजीराजांना अपमानास्पद रीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. ‘सत्मंजिल ‘ या हवेलीत शहाजी राजांना आदिलशहाने कैद करून ठेवले .


या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवाना सुद्धा केली। शिवाजीराजे आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरिता.


राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय। बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल लेकरा , स्वराज्य हवे की बाप हवा ? शहाजीला आम्ही कोणत्याही वेळी ठार मारू शकतो। तरी शांततेने शरण ये। जे जिंकलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर क्षमा माग. तर तुझा बाप सुटेल. नाहीतर पूर्ण भोसल्यांचे खानदान समाप्त करून टाकू. हा सवाल भयंकर होता वडिलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण ? काय वाचवायचं ? आईचं सौभाग्य की स्वराज्य ?


दोन्ही सुद्धा तीर्थरुपच! मग दोन्हीही वाचवायचे। हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात संत ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झुंज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. खरोखरच संत तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात राज्य करत होते. ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ! ‘


राजे खूप सावधाणीने विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात लिहत होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेने पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.

Post a Comment

0 Comments